Friday, June 5, 2020

अनुराधा (भाग ६)

अनु सकाळी लवकर घरातून निघाली . आज तिला समीरबद्दल जाणून घ्यायचं होत . अंजलीला आज पटकन गाठावं आणि काय ते स्पष्ट करून घ्यावं . ती आज बसनेच ऑफिसला आली होती . बराच वेळ ऑफिस बिल्डिंगच्या खाली वाट पाहून कंटाळा आला तेव्हा ती ऑफिसमध्ये जाऊन पोहोचली . स्वतःची पर्स जागेवर टाकून दोन-तीनदा तिच्या चकरा झाल्या रिसेप्शयनला . आज भेटायचं तर अंजली गायब शेवटी ती जाऊन आपल्या जागी बसली . पण तिची नजर मधून अधून कुठे अंजली दिसते आहे का यातच गुंतली होती . पण नंतर तिला समजलं अंजलीचा अपघात झाला आहे . तिने मनात विचार केला आपण उगाच विचार करत होतो आणि त्या बिचारीच काय झालं असेल . तिला जेव्हा समजलं कि ती आहे ते हॉस्पिटल जवळच आहे तेव्हा तिने मनाशी पक्क केलं कि जाऊन यावं तिकडे . संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर दोघी-तिघी तिच्यासोबत अंजलीला बघायला गेल्या . तिथे गेले तेव्हा त्यांनी पाहिलं कि अंजली झोपली आहे आणि तिच्या डोक्याला पट्टी आहे आणि हाताला बँडेज आहे . सोबत तिची आई बसली होती . तिने अंजलीला जाग केलं . ती उठून बसली . तिची आई काहीतरी आणायला बाहेर गेली . तेव्हा सगळ्यांच्या गप्पा छान रंगल्या होत्या कुणालाही याची आठवणच राहिली नाही कि तिची तब्बेत ठीक नाही .
अंजली सांगत होती अगं काही नाही गं कोण एक मूर्ख बाइकवाला आला आणि पाठीमागून डॅश दिली . मी सावध नव्हते त्यामुळे पडले . हात फ्रॅक्चर झालाय बाकी काही नाही . '
' अगं फक्त हातच फ्रॅक्चर झालाय तर मग इथं का ठेवलंय . घरी का जाऊ नाही दिल . ' पूजाने सगळ्यांच्या मनातला प्रश्न तिला विचारला .
यावर अंजली म्हणाली " अगं डोक्यालापण दुखापत झाली आहे ना . ते अंडर ऑबझर्वेशन साठी म्हटले ते आज थांबा . उद्या जाता येईल . "
" म्हणजे तू डोक्यावर पडलीयस " राधानं अचानक असं विचारलं आणि सगळ्या हसू लागल्या .
नर्सने येऊन जवळपास त्यांना हाकलेपर्यंत त्या तिथेच होत्या . अंजलीही खूप रिलॅक्स झाली होती आता . तेव्हा त्या तिचा निरोप घेत निघाल्या . सगळ्या किती अवली आहेत असा विचार बसमधून येताना अनुच्या मनात होता .
मध्ये काही दिवस असेच गेले अंजलीने काही दिवस सुट्टीच घेतली होती . अनुराधाही जरा जास्त काम असल्यामुळे तिची कामाची वेळ थोडी बदलली होती . सकाळी थोडं लवकर जावं लागत होत आणि संध्याकाळी नेहमीपेक्षा उशीर होत होता . यामुळे हे काही दिवस तिची समीरसोबत भेट झाली नव्हती . कामामुळे तिला ते लक्षातही आलं नव्हतं . जवळपास ती त्याला विसरून गेली होती .
आणि अचानक ती बातमी आली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली . अंजली गेली होती या जगातून अगदी कायमची . इतकंस लागलेलं तिला त्या दिवशी आपण किती हसलो बोललो आणि आज अचानक असं काय झालं ? तिच्या मनात खूप असूनही तिला जाता आलं नाही अंजलीच्या घरी . त्यामुळं तिला खूप वाईट वाटत होत . काही दिवसांनी तिच्या आईला भेटायचं मात्र तिने मनात ठरवलं होत . या विचारात ती निघाली होती एव्हढ्यात तिला मागून कुणीतरी हाक दिली पण तिचं लक्ष नव्हतं आणि ती तशीच पुढे गेली . तेव्हढ्यात एक बाईक अचानक तिच्या समोर येऊन थांबली . तिने दचकून पाहिलं . समीर होता . तिने रागाने विचारलं
" काय चाललंय तुझं ? "
" अगं काय ? काय झालंय ? लक्ष कुठं आहे तुझं ? मघापासून तुला हाक मारतोय आणि तू पुढेच निघाली आहेस . आणि म्हणून असा समोर आलो तर तू किती भडकते आहेस ? "
" तुला काही कळत का ? मी विचारात होते , माझं लक्षही नव्हतं म्हणून नसेल ऐकू मला . पण म्हणून काय अशी एकदम गाडी अंगावर घालायची का ? "
" अगं रिलॅक्स . मी अंतरावर होतो तुझ्यापासून आणि फक्त समोर गाडी आणली इतकंच . "
" म्हणजे असं वागून तुला त्याच काही वाटतच नाही ना . ठीक आहे तू हो बाजूला मला जाऊ दे "
" अगं एव्हढी चिडतेस का ? शांत हो . "
पण ती आज ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती . ती त्याला तसच ठेऊन निघाली . त्याने क्षणभर विचार केला तिला विचारावं काय झालय ,  मग त्याने विचार केला आता तिचा मूड खराब आहे . आणि असं परत परत तिच्या समोर जाणं ठीक दिसणार नाही . म्हणून तो तसाच निघून गेला . तिने तो आहे कि गेलाय हे पाहण्याचीही तसदी घेतली नाही आणि ती तडक तशीच निघून गेली .

.... क्रमशः 

No comments:

Post a Comment