Monday, May 18, 2020

First Love ( भाग १ )

आज किती दिवसांनी गावी निघालो आहे . ते गाव जिथ बालपण गेल माझ. किती आठवणी आहेत माझ्या . किती छान दिवस होते ते .  जेव्हा गावी होतो . पण म्हणतात ना आयुष्य नेहमी एकसारखच नाही राहत . त्याचाच अनुभव आला . आणि बाबांसोबत तालुक्याच्या गावी जाणं झालं आणि पुढे मग पुण्याला . आजी आजोबा इकडे आले आणि मग कधी गावाला जाणंच झालं नाही .

किती इच्छा होती इथं येण्याची आणि आज ती इच्छा पूर्ण होते आहे . ते शिवार , ती नदी , ती साधी भोळी माणसं आणि .... आणि आरती . काय वेळ होती ती . कधी एक क्षण गेला नाही तिच्याशिवाय . नेहमी तिच्याच सोबत असायचो . सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिच्या असण्याशिवाय आपलं पानही हलायचा नाही आणि मध्ये किती दिवस , किती वर्ष अशीच गेली .... तिला न भेटता , तिच्याशी न बोलता , तिला न पाहता . इतके दिवस तर निघून गेले पण आता जेव्हा मी गावापाशी आलो आहे आणि मला माहित आहे ती आता भेटणार आहे . आणि यासाठी काहीच क्षण बाकी आहेत . पण हे क्षणच खूप मोठे वाटू लागले आहेत . आता मात्र धीर धरवत नाही . तिला भेटायला आतुर झालोय .

एकदाच गाव आलं आणि मग इतक्या वर्षांपूर्वी पाहिलेले ओळखीचे , थोडे अनोळखी चेहरे , काहींची ओळख लागत होती तर काही नव्हते आठवत . तिचं घर जस जस जवळ येऊ लागलं तसं काळीज धडधडत होत . तिचे आई बाबा भेटले . मुश्किल वाटलं त्यांना ओळखणं पण शेवटी ओळख लागली . काका शेतावर निघाले होते त्यामुळे ते लगेच गेले . काकुंसोबत गप्पा मारत होतो आणि अचानक कुणीतरी पाठीत जोरदार धपाटा घातला . वळून पाहतो तो समोर आरती .
=========================================================
" हं इकडे कुठे वाट चुकला ? "
ते डोळे , ती बोलण्याची पद्धत ती अजूनही तशीच होती जशी आठवत होती . तिनेही त्याला क्षणात ओळखलं होत . तिला पाहून तर त्याला आनंद झाला होता पण पाठीत बसलेल्या धपाट्यामुळे रागही आला होता म्हणून तो म्हणाला
" तू आहेस होय अजून , मला तर लक्षातच नाही आलं कि तू असशील . "
" का तुला काय वाटलं गेले मी ? "
काकूंना समजलं आता यांच्या मध्ये पडण्यात काही अर्थ नाही . म्हणून त्या म्हणाल्या
" तुमचं चालू द्या निवांत मला स्वयंपाक करायचा आहे मी जाते . "
आणि त्या तिथून निघाल्या .
" बघ तुझ्यामुळे काकू गेल्या . " राहुल तिला चिडवत म्हणाला .
" माझ्यामुळे नाही काही ती तुझ्यामुळे गेली . तुलाच लागत ना सारखं भांडायला . " आरतीही काही कमी नव्हती ती फणकाऱ्याने म्हणाली .
" बघा कोण बोलतय ? जिचं जेवण भांडल्याशिवाय पचत नाही ती सांगतेय . " तो तिला तोंड वेडावून म्हणाला .
" गप चिडकू . आठवतंय ना तुला सगळे चिडकू म्हणायचे . " तीही काही कमी नव्हती ती त्याला तोडीस तोड उत्तर देत होती .
" आणि तुला काय म्हणायचे ते आठवतंय ना " आता मात्र तीच बोलणं त्याला लागलं होत आणि तो आपलं महत्वाचं अस्त्र वापरू इच्छित होता .
तिने दोन्ही हात कमरेवरती ठेवले आणि ती त्याच्याकडे ऍटिट्यूडमध्ये पाहू लागली .
" काय आता नवीन नाव का रखुमाई ? " त्यानं विचारलं .
" हे नाव आवडेल मला . " तिला खरंच ते नाव आवडलं होत .
" आणि ते नावं " तो परत त्या अस्त्राचा वापर करण्याच्या विचारात होता .
ती परत त्याच ऍटिट्यूडमधे त्याच्याकडे पाहत होती त्यामुळे त्याच धाडस झालं नाही तिला त्या नावाने हाक मारायला . त्याने तिला तशी हाक नाही मारली तरी तिला त्याचा राग आला होता . ती निघून जाऊ लागली . तेव्हा तो तिला म्हणाला
" अगं कुठं निघालीस ? "
" काम आहे मला . " असं म्हणत ती घुश्यातच निघाली .
" अगं मी इतक्या दुरून आलो आणि तू निघालीस . " ती निघाली तसा मात्र त्याचा धीर सुटला .
" आलास ते काही मला भेटायला थोडीच आला आहेस . " ती पुढे जात म्हणाली .
" अगं थांब ना . " तो तिला थांबवत होता पण ती गेलीच .
=============================================================
जेवण वगैरे झालं आणि तो जरा फिरायला म्हणून बाहेर पडला . जातानाच आरती भेटली . दोघंही निवांत गप्पा मारत निघाले . दोघांची लहानपणीची एक गोष्ट मात्र तशीच राहिली होती ती म्हणजे कितीही भांडण झाली किंवा काहीही बोलणं झालं तरी त्यांना काही फरक पडायचा नाही . ते पुढच्यावेळी भेटायचे ते अगदी सहज पाठीमागच काही लक्षात न ठेवता . खूप जुन्या आठवणी निघत होत्या दोघेही त्या भूतकाळात रमले होते .
" पण एक सांग तू कस ओळखलस मला ? " आरतीने मधेच त्याला प्रश्न केला .
" त्यात काय तशीच तर आहेस " राहुलनेपण सहजपणे सांगितलं .
" तशीच आहे का मी ? " - आरती
" हो " - राहुल
" छे सगळे म्हणतात किती बदल झाला आहे . " - आरती
" हो बदल तर झाला आहे " - राहुल
" आता म्हणत होता काही बदल नाही आणि आता म्हणतोय बदल झालाय . उगाच आपलं हो मध्ये हो मिळवायचं . " - आरती
"तस नाही ग काही गोष्टी तशाच आहेत आणि काही बदलल्या आहेत . " - राहुल
" हो का मग सांग काय तसंच आहे " - आरती
" तुझे डोळे तसेच नितळ निरागस , तुझी बोलण्याची पद्धत , एव्हढं अधिकारानं कोणी बोलत नाही तुझ्याशिवाय माझ्याशी . आणि ते आवडत मला . " - राहुल
तिला थोडं लाजल्यासारखं वाटत होत तरी तिने त्याला विचारलं .
" आणि बदल काय झाला आहे ? " - आरती
" आता किती सुंदर झाली आहेस " तो तिच्या डोळ्यात डोकावून म्हणाला .
ती लाजली पण ते न दाखवता लटक्या रागाने म्हणाली
" का तेव्हा नव्हते का ? " - आरती
" होतीस ना पण इतकी नाही . " - राहुल
आता मात्र ती लाजली.
" चल तुझं आपलं काहीतरीच . " - आरती
" अगं खरंच आणि हे लाजायला कधीपासून लागलीस . आधी तर नव्हती अशी " - राहुल
" आता किती तरी गोष्टी बदलल्या आहेत पण तुला लक्षात कुठं येत आहेत ? " - आरती
त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं . ती नजर चोरून दुसरीकडे पाहू लागली .
" हं खरंच गं माझ्या लक्षातच नाही आलं . " - राहुल
तिला ते सगळं छान वाटत होत पण क्षणात तिला परिस्थितीच भान आलं . तो किती दिवस दूर आहे . तिकडे शहरात किती मॉडर्न लाईफ आणि आपण कुठे . म्हणून ती म्हणाली
" तिकडच्या आयुष्यातून तुला कुठे वेळ मिळणार आहे ? "
" इतक्या सुंदर लोकांसाठी नक्कीच मिळेल कि . " - राहुल
" का ? तिकडे असतील ना पऱ्या " - आरती
हे बोलून ती काहीशी फुरंगटून बसली होती . मग त्याला समजलं आणि तो तिला म्हणाला
" कशाला हवी अगदी परी, पण असावी जरा बरी . आणि तू आहेस ना बरी . "
" मी बरी काय . आता जरी तयार होऊन बाहेर पडले तरी किती मुलांची नजर नाही ढळणार " - आरती
त्याने पटकन तिचा दंड पकडला आणि म्हणाला
" कशाला हवं कोणी ? तू फक्त माझी आहेस . "
तो असं बोलल्यावर ती एकदम बावरली . काय करावं तिला कळेना . पण तशीच स्वतःला सावरत म्हणाली
" आणि हे कधी ठरवलस " - आरती
" मी एकट्याने थोडीच हे ठरवलंय तुलाही हेच वाटत ना . " - राहुल
तिला काय बोलावं हे समजत नव्हतं . किती वेळ ती खालीच पाहत होती . मग तिला कसलीशी आठवण झाली आणि ती म्हणाली
" खोटं सगळं खोटं . असच होत तर मग इतक्या वर्षात तुला माझी आठवण तरी आली का ? "
" तुला सांगू इतके वर्ष तू सोबत नव्हतीस तर ठीक नव्हतं वाटत . सारखी तुझी आठवण येत होती कधी तुला भेटेन असं झालं होत . " - राहुल
" हो का , म्हणून आल्या आल्या माझ्याशी भांडलास का ? " - आरती
" तू पाठीत मारलस म्हणून राग आलेला म्हणून बोललो . पण म्हणून प्रेम नाही कमी झालं . " - राहुल
हे ऐकून मात्र ती लाजून चूर झाली .
" काय ग किती लाजतेय . " - राहुल
ती मान खाली घालून तशीच उभी होती . त्याने हळूच तिची हनुवटी वर केली आणि तिला म्हणाला
" वर बघ ना "
पण ती काही केल्या वर बघत नव्हती
" बघ ना मला तुझ्या डोळ्यात पाहायचं आहे " - राहुल
तिने नजर वर केली
" हाये मार डाला " - राहुल
तिने लाजून परत मान वळवली . त्याने तिची मान परत वर करण्याचा प्रयत्न केला तशी ती त्याला धक्का देऊन तिथून सटकली .
" अग थांब तरी " पण ती काही थांबली नाही .
=============================================================
" का गं मघाशी का गेलीस ? " - राहुल
" का गेलीस काय ? काय चाललं होत तुझं . एक तर इतके वर्षांनी आलास आणि आता एकदम हे असं ... " असं म्हणत बोलता बोलता ती थबकली . त्याला जाणवलं तिला थोडं अवघडल्यासारखं होत आहे . तेव्हा तिला थोडं नॉर्मल करण्यासाठी तो म्हणाला
" तुला आठवतंय किती भांडायचो आपण एकमेकांसोबत . "
" मग भांडू का आता तुझ्याशी ? " - आरती
" बघ म्हटलं ना तूच भांडखोर आहेस . " - राहुल
" कोण म्हटलं कि आपण किती भांडायचो ? " - आरती
" अग तेव्हा भांडायचो असं म्हटलो मी . आता भांडूया असं नाही . " - राहुल
" का तुला कंटाळा आला का भांडायचा ? कि घाबरलास मला ? " - आरती
" तस नाही खूप भांडलो कि आता थोडं प्रेम करूया म्हटलं . " - राहुल
ते ऐकून ती थोडी लाजली पण क्षणात स्वतःला सावरत म्हणाली
तू कधीपर्यंत आहेस इथे ? "
" आज आहे . उद्या पहाटे परत निघणार . " - राहुल
ती खट्टू झाली आणि म्हणाली
" आणि मग परत कसा भेटणार मला ? "
" अगं भेटू ना आपण असं का म्हणतेस ? " - राहुल
" तेच म्हणतेय कधी ? हे बघ तुझं जग फार वेगळं आहे . इथून गेलास कि परत कधी येशील कधी नाही काही माहित नाही  मग हे कशाला ? " - आरती
तो थोडा भावूक झाला आणि म्हणाला
" असं का म्हणते आहेस तुझं नाही का प्रेम माझ्यावर ? "
" असं नाही रे पण या प्रेमाला पुढं काय भविष्य असेल म्हणून म्हणतेय या वाटेवर नको जायला . " - आरती
" हे बघ खरंच जर प्रेम असेल तर रस्ता सापडतो त्याला . " - राहुल
ती काहीच नाही बोलली . मग त्याने परत तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलायला तयार नव्हती . त्याने खूप आर्जव करूनही ती तयार झाली नाही . आणि शेवटी म्हणाली
" जे अशक्य आहे त्या रस्त्यावर नको चालायला . "
एव्हढं बोलून ती निघाली .
त्याने तिला अडवायचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली
" आता जा तू . आपली मैत्री तेव्हढी लक्षात राहू दे . "

... क्रमशः

Tuesday, May 12, 2020

मित्र प्रेम

" अरे तुला उमा आठवते . " रोहन आठवणींच्या खोल डोहात उतरत असल्यासारखा म्हणाला . 
" ती शेंबडी ? " राजेश मात्र अजून इथेच होता आणि त्याला भूतकाळ बहुदा असाच आठवत असावा . त्यावर रोहन थोडा चिडला . त्याने राजेशकडे रागानं पाहिलं . पण क्षणात स्वतःला सावरत म्हणाला 
" ते तेव्हा "  
" मग आता सुकलाय का " राजेश अजून त्याच मूडमध्ये होता . 
रोहनने परत स्वतःला सावरलं आणि म्हणाला 
" तू बघ एकदा मग कळेल " त्याच्या डोळ्यात बदाम तरळले होते . 
" म्हणजे माझ्यासाठी विचारतो आहेस का ? स्थळ म्हणून सुचवतो आहेस का ? " राजेश अजून त्याच्या भावना समजू शकत नव्हता . पण त्यामुळे रोहन पुरता भांबावला आणि पटकन म्हणाला 
" ए नाही नाही . माझाच इंटरेस्ट आहे . " त्याच्या डोळ्यातले बदाम गडद होत चालले होते . 
" बर " राजेश त्याच्या पुढं बोलण्याची वाट पाहू लागला . थोडा वेळ स्वतःच्या स्वप्नात हरवून होता मग एक दीर्घ श्वास घेऊन तो सांगू लागला . 
" अरे बऱ्याच दिवसांनी अचानक भेट झाली . म्हणजे मी ओळखलंच नव्हतं तिला . तस म्हणजे तिनेपण मला नव्हतं ओळखलं . "
" मग कस रे ? " राजेशला आश्चर्य वाटल्याचं पाहून रोहन थोडा सुखावला होता व आता फुलून सांगू लागला . 
" अरे तिथे सगळे डिटेल्स सांगायचे होते आणि मी सांगत होतो . म्हणजे त्याआधी १० मिनिट आम्ही सोबत उभे होतो . ती माझ्या मागेच उभी होती पण नाही ओळखलं . पण मी माझं पूर्ण नाव सांगितलं तशी ती पुढं येऊन मी सांगत असलेली माहिती ऐकत होती . मला समजत नव्हतं असं का चाललंय . पण  मग तिनेच स्वतःहून ओळख सांगितली . अरे किती वर्षांनी भेटलो होतो . आपण प्राथमिकला सोबतच होतो जयप्रकाश मध्ये . " - रोहन 
" जयप्रकाश विद्यालय . हं आता त्याच नाव पण बदललं . म्हणजे ते आपल्या नंतरच्या एक-दोन बॅच नंतरच बदललं होत . पण ... बर ते असो तू सांग " - राजेश  
" हो आणि त्यानंतर ती परगावी गेली ते परत भेटलीच नाही . आणि आता अशी...  अशी ओळख व्हावी . किती वर्ष गेली मध्ये . पण मग त्यावरूनच किती बोलणं झालं आमचं . किती बोललो आणि किती नाही काहीच समजत नव्हतं . इंजिनिअर आहे ती . "
ते ऐकून मग मात्र राजेशला राहवलं नाही आणि त्याने रोहनला मधेच अडवून विचारलं  
" आणि तरीही तिचा विचार करतोयस ? "
काहीही न कळून रोहनने विचारलं " म्हणजे ? "
" अरे बघ तुम्ही दोघंही इंजिनिअर मग पोटापाण्याच काय ? " राजेशने स्पष्टीकरण दिल . 
" अरे छे तस काही नाही . तीच चांगलं चाललं आहे . " - रोहन 
" आणि तुझं काय ? गेली ४ वर्ष जॉब सोडायचा म्हणतोय , स्वतःच काही करायचं होत तुला . काय कन्सेप्ट आहे ते पण नाही सांगत आहेस . " -  राजेश 
" अरे एकदा होऊ दे रे मग सांगेन . " - रोहन
" जशी तुझी मर्जी " - राजेश 
" पण तुला सांगू किती वेळ बोलत होतो काही समजलाच नाही . खूप लाघवी बोलते रे ती . " - रोहन 
राजेशने पाहिलं तो काही तिच्या स्वप्नातून बाहेर येत नाहीये . ते पाहून तो स्वतःशीच हसला आणि म्हणाला 
" हं , तुला ती बंडी आठवते का ? " - राजेश 
" बंडी ? कोण ? " - रोहन 
" अरे ती रेणुका " - राजेश 
" ? " - रोहन 
" अरे चौथीपर्यंत होती आपल्या सोबतच . " - राजेश 
" हो ? " तो डोक्याला ताण देत म्हणाला " बंडी म्हणजे ती खालच्या आळीतली तर नाही ? "
" तीच ती " - राजेश 
" तुला तिच्यात इंटरेस्ट होता ? " रोहनने आश्चर्याने विचारले . 
" ते नाही रे . ती आपल्यासोबत होती प्राथमिकला ते म्हणतोय . " - राजेश 
रोहनच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडत नव्हता . तो तसाच म्हणाला 
" अच्छा . पण तीच काय ? " 
" हा . तर ती किती वर्षांनी आता भेटली . तिचं लग्न झालं . दोन पोरं आहेत तिला . " - राजेश 
" काय सांगतोस " रोहनचा विश्वासच बसत नव्हता यावर . 
" अरे लवकर झालं लग्न , मग लगेच मूल . बाकी काही लोकांची ती पद्धतच आहे . लग्न करा आणि एक दोन पोरांचं लोढणं तिच्या गळ्यात मारा आणि मग कसही राहा , कसही वागा तिच्याशी . ती काही करू शकत नाही , कि कुठं जाऊ शकत नाही . " राजेश तळमळीने सांगत होता . पण त्याला काय मुद्दा सांगायचा आहे हे मात्र रोहनच्या लक्षात येत नव्हतं . तरीही तो तसाच म्हणाला 
" हं , खरं आहे तुझं . "
राजेश मात्र पुढं सांगतच होता . 
" तो जग्गू आता रिक्षा चालवतो . पव्या, आपला पव्या किती हुशार होता . पण पुढे काही नाही केलं . बाबांचं किराणा मालाच दुकान होत , तेच चालवतो आहे आता . राजा ... शाळेत किती वर्ष ढकलगाडी सुरु होती त्याची किती वर्ष नापास होत होता काय माहित पण आता पुढारी झालाय . त्या दिवशी दिसला पांढरे कपडे सोबत एक-दोन कार्यकर्ते . बोलावं म्हटलं तर त्याच सुरु झालं त्याचे साहेब , त्यांचा पक्ष , समाजकार्य . मी पटकन काढता पाय घेतला तिथून . "
" हो का ? " यावर नक्की काय बोलावं हे रोहनला समजत नव्हतं त्यामुळं तो इतकाच बोलू शकला . 
" अरे हे सगळे आहेत ना ते आपण सगळे एका वर्गात होतो . पण आता बघ प्रत्येकाचं आयुष्य किती बदललंय . " राजेश अजूनही धगधगतच होता . रोहनने मात्र आता पुरती शरणागती पत्करली होती . आणि तो फक्त त्याला होकार दर्शवत म्हणाला 
" हो खरंय तुझं . "
" तेच सांगतोय तुला . तेव्हाची गोष्ट वेगळी होती , तेव्हाच जगच वेगळं होत . आणि मुलींचं कस असत ना त्यांच्या अपेक्षा फार असतात आणि आपण समान वयाचे असू तर आपण सेटल होईतो त्या लग्न होऊन जातात पण . म्हणून सांगतोय उगाच भलत्या मोहात पडू नकोस . "
राजेश इतकं काही बोलला होता कि रोहनला स्वप्नातून एकदम भानावर आल्यासारखं काहीतरी झालं . तो एकदम शांत झाला . त्याच्या खांद्यावर थोपटून राजेश तिथून निघाला . 
============================================================

" अरे त्यानंतर आपण भेटलोच नाही . आणि आता हे लोकडाऊन असताना कस केलस ? "- रोहन 
" अरे मोठी स्टोरी आहे सांगेन कधीतरी निवांत . "- राजेश 
" बर पण फोटो तरी टाक कि नुसतं आपलं ' Married ' एव्हढच स्टेटस अपडेट केलंस . " - रोहन 
" अरे हो करायचं सगळं . येईल फोटो पण . बर चल परत बोलू आता गडबडीत आहे . " असं म्हणत त्याने फोन ठेवला . इकडे रोहन मात्र त्याने हे सगळं कस केलं असेल याच विचारात होता . 
चार दिवसात स्टेटसला फोटो आला . उमा आणि राजेशचा गळ्यात हार घातलेला . 
' हर एक फ्रेंड कमीना होता है ' गाणं फोटोच्या बॅकग्राऊंडला वाजत होत, कि बाहेर कि त्याच्या बॅकग्राऊंडला वाजवलं जातंय हेच त्याला कळेना .